पहलगाम हल्ल्यात गुप्तचर यंत्रणा कमी पडली   

निवृत्त लष्करी अधिकार्‍यांचे मत 

पुणे :  दहशतवादाला तोंड देण्यासाठी युद्ध हा पर्याय नाही. समोपचारानेच शांतता प्रस्थापित करता येते. मात्र, ज्यावेळी युद्धाशिवाय पर्याय नसतो. त्यावेळी युद्ध करावेच लागते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपली गुप्तचर यंत्रणा कमी पडली, अशी खंत निवृत्त लष्कर अधिकार्‍यांनी शुक्रवारी व्यक्त केली. युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि असीम फाऊंडेशन आयोजित ’ऑपरेशन सिंदूर’ नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार अंतर्गत निवृत्त लष्कर अधिकारी विनायक पाटणकर, एस. एस. हसबनीस, एस. एस. सोमण यांची मुलाखत घेण्यात आली. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 
 
पहलगाम परिसरात सैन्य तैनात असते, तर कदाचित दहशतवाद्यांना तेथेच चिरडता आले असते. जो नरसंहार घडला, तो कदाचित घडला नसता. पहलगाम येथे मृत्यू डोळ्यासमोर दिसत असतानाही कोणीही प्रतिकार केला नाही. सर्वसामान्य नागरिकांनी प्रतिकार केला असता, तर कदाचित काही प्राण वाचले असते. मुळात पहलगाम हल्ल्याबाबत सैन्यांना कोणाकडूनही कसलीच कल्पना देण्यात आली नव्हती. मोघम चर्चा आणि अचूक संदेश यात खुप मोठा फरक असल्याचेही निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण पाकिस्तानात जे हल्ले केले. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत होती. ज्या वेळी आपण युद्धासाठी तयार असतो. त्या वेळी समोरच्या शत्रुची संपूर्ण माहिती असणे आवश्यक होते. भारत हल्ला करणार हे पाकिस्तानला माहिती होते. ते आपल्या हल्ल्याची प्रतिक्षा करत होते. मात्र आपण कधी, कोठे आणि कशा स्वरूपाचा हल्ला करणार याची पुसटशी कल्पनाही पाकिस्तानला होऊ दिली नाही. उलट शत्रु राष्ट्राचे सर्व हल्ले परतवून लावण्यात आपल्या सैन्याला यश आले. कारण आपण सर्व प्रकारे तयार होतो. उदिष्ट्ये मर्यादित असतील, तर युद्धही मर्यादित असते, असेही लष्कर अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. प्रारंभी पुनीत जोशी, सारंग गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
 
दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे हेच लक्ष
 
यावेळी पाकिस्तानला थडा शिकवायचा की? दहशतवाद्यांना मारायचे असे पर्याय सैन्याकडे होते. त्यात दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचा पर्याय सैन्यांनी निवडला. हल्ल्यामागचा उद्देश स्पष्ट असल्याने हवाई हल्ल्यात केवळ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. आपल्या हल्ल्यात काही दहशतवादी मारले गेले आहेत. येत्या काळातही दहशतवाद हेच आपले लक्ष राहणार असल्याचेही निवृत्त लष्कर अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. 

Related Articles